किकली (सातारा) : राज्याचा पुरातत्त्व विभाग आणि सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्यदिनी वीरगळ संवर्धनाची संयुक्त मोहीम राबवण्यात आली. वीरगळ संवर्धनाच्या या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील किकली या गावात एका वेगळ्याच उत्साहाचे ‘लाइव्हली’ वातावरण होते.
सातारा जिल्ह्यातील चंदन आणि वंदन या किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या किकली गावात प्राचीन हेमाडपंती भैरव मंदिर आहे. गावातील ग्रामपंचायतीसमोरील वडा जवळ विविध प्रकारचे वीरगळ मातीत गाडले गेले होते. राज्याच्या पुरातत्त्व विभागाने भैरवनाथ मंदिरासोबत वीरगळांचेही संरक्षण केले आहे.
पुरातत्त्व विभागाचे पुणे विभागाचे संचालक विलास वाहने यांनी याची माहिती दिली आणि संयुक्त मोहीम आखली गेली. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान भैरवनाथ मंदिर परिसराची व गावातील इतर ठिकाणी पडलेल्या वीरगळांची पाहणी करण्यात आली. ग्रामसभेत सरपंच दीपक बाबर यांनी वीरगळ संरक्षण-संवर्धनाबाबतची माहिती गावातील लोकांना दिली. कार्याध्यक्ष प्रवीण शिर्के यांनी गावातील तरुणांना वीरगळांचे महत्त्व समजावून सांगितले. राज बालशेटवार, गौरव शेवाळे व गणेश रघुवीर यांनी गावातील इतर ठिकाणे, मंदिरे, पाडे, चौक येथील वीरगळांची पाहणी करून नोंद केली. ग्रामपंचायतीसमोरील पाड्यांजवळील जमिनीत अर्धे गाडले गेलेले वीरगळ काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले व ते स्वच्छ करण्यात आले. ट्रॅक्टरने वीरगळ भैरवनाथ मंदिर परिसरात नेण्यात आले. सर्व वीरगळांची सविस्तर माहिती घेऊन त्यांची नोंद करण्यात आली.
या मोहिमेत महेंद्र जाधव, प्रवीण शिर्के, गौरव शेवाळे, राज बालशेटवार, अमित जाचक, रोहित देशमुख, कुमार गुरव, गणेश कोकरे, तुषार बाबर, गणेश रघुवीर, सूर्यकांत चव्हाण, अतीशभाऊ व इतर शिवप्रेमी सहभागी झाले होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर व सातारा या भागांतून मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी या मोहिमेत सहभाग घेतला होता, अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसंवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली. राज्य पुरातत्त्व विभागाचे (पुणे) संचालक विलास वाहने आणि किकली गावाचे सरपंच दिलीप बाबर यांचे रघुवीर यांनी विशेष आभार मानले.